रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

थरकाप उडवणारा महापूर प्रसंग

थरकाप उडवणारा महापूर प्रसंग

काहि दिवसांपूर्वी कोकणासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विशेषत: कोल्हापूर, सांगली  इथे आलेल्या महापूराने थैमान घालून अक्षरश: होत्याचे नव्हते केले. जिवित व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून हजारोंचे संसार उध्वस्त झाले आहेत. शासकीय मदत तसेच इतर दानशूर व्यक्ती- स्वयंसेवी संस्थांनी लावलेल्या हातभाराने हि शहरे लवकरच पुन्हा उभी राहतील हि अपेक्षा आहे. मात्र कोल्हापूर-सांगलीतला हा महापूर पाहून मला  जुलै १९८९ साली रायगड जिल्ह्यात आलेल्या अशाच जलप्रलयाची आठवण आली.तेव्हा रायगडमधील नागोठणा-जांभूळपाडा येथील अंबा नदीला महापूर आल्याने पाण्याचा मोठ्ठा लोंढा तयार होऊन त्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना कवेत घेतले होते. माझा पेण तालुक्यात असलेला घोडाबंदर गाव देखील तेव्हा पाण्याखाली गेला होता. तेव्हा मी पाचवी इयत्तेला असेन. वडील नोकरी निमित्त मुंबईत होते. त्यामुळे गावी मी माझे आजी-आजोबा, आई सोबत पाच सहा महिन्याची माझी भाऊ- बहिण, काका-काकू यांच्यासह राहत होतो. लहान असल्यामुळे तितकीशी जाण नव्हती, मात्र आपल्यासमोर काहितरी संकट आल्याची कल्पना आली.माझ्या गावामध्ये पूर..पूर अशी भयभीत होऊन ओरड सुरू झाली होती.गावातील माझ्या नातेवाईकांसह इतरांच्या घरात पाणी घुसू लागले होते. पुराच्या पाण्याच्या पातळी वाढत असल्याचे पाहून ज्यांच्याकडे होडी होती (भातशेती सोबत गावकरी जोडधंदा म्हणून मच्छिमारी करायचे) त्यांनी पुरात सापडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवायला सुरूवात केली. सुदैवाची गोष्ट म्हणजे आमचे कुडाचे घर तेव्हा उंचावर असल्यामुळे घराच्या थोडे उंबरठ्याखाली म्हणजे शेवटच्या पायरीपर्यत पाणी लागले होते. यावेळी सुरक्षेचा पर्याय म्हणून आश्रयासाठी दोन सख्खे चुलत आजी-आजोबांच्या कुटुंबांचा संसारसुध्दा त्यांच्या घरातून आमच्या घरी हलवला होता.काहि क्षणातच नजरेच्या टप्प्यात  चहुकडे  पाणीच पाणी दिसत होते.
     एव्हाना शासनापर्यत पेण तालुक्यातील अनेक गावे पुरामुळे बुडाल्याची खबर पोहचली होती.  त्यानुसार पुरग्रस्त गावांमध्ये हेलिकॉप्टरने बिस्किट पुडे, पावाची तसेच चपाती- भाजी ,रव्याची पाकिटे देण्यात येत होती. आजोबा तर काठीला लुंगी लावून त्याचा झेंड्याप्रमाणे वापर करत मदत मागताना दिसल्याचे मला अजूनही आठवतय.आमचे गाव खाडी किनारी असल्यामुळे समुद्राच्या भरतीचे आणि पुराचे पाणी गावात तुंबून राहून हाहाकार माजवण्याची दुहेरी भिती होती.मात्र सुदैवाने तीन चार दिवसांनी हा पूर हळू हळू ओसरला. या पुरात आमच्या गावासह आसपासच्या वाड्या- गावांमध्ये कुठली जिवित हानी झाली नसली तरी अनेकांची संसारोपयोगी सामान, भांडी-कुंडी,कपडे, महत्वाच्या वस्तू इत्यादी डोळ्यासमोर वाहून गेल्या तर काहिंच्या वस्तूंचे नुकसान झाले. महापूरासारख्या या कसोटीच्या क्षणी गावकरी भयभीत जरूर झाले होते, मात्र सर्वांनी मोठ्या धैर्याने, एकमेकांना आधार देऊन या संकटाचा सामना केला. आज इतक्या वर्षानंतरही गावातला हा महापूराचा प्रसंग माझ्या मनात कायम कोरलेला आहे.


--पंकजकुमार पाटील, कांजुरमार्ग
(लतासुत)


बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९

"मैत्री" अबाधित राहो...


"मैत्री" अबाधित राहो...

ऑगस्टच्या पहिल्या रविवारी "मैैैैत्री दिन" साजरा केला होतो. खरेतर इतर सण-उत्सवांपेक्षा मैत्रीचा दिवस हा आगळा-वेगळा असतो. माझ्या मते मैत्री दिन साजरा करायला हा दिवस केवळ निमित्तमात्र ठरतो. कारण वर्षाचे 365 दिवस नसले तरी त्यापैकी निम्मे दिवस तरी दोस्ती-मैत्र म्हणून आपण एकमेकांच्या संपर्कात असतो वा संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.
     मैत्री करण्याला वय,नात्याचे,स्थळ-काळाचे,गरिब-श्रीमंतीचे,जाती-धर्माचे बंधन मूळातच असू नये. कुणाची आई,वडिल, मुलगा, मुलगी, भाऊ- बहिण तसेच पत्नी -पतीसोबत चांगली मैत्री असू /होऊ शकते. आपली हि मैत्री कधी, कुणाशी कोणत्या वेळी होईल हे देखील आपण सांगू शकत नाही.
       शाळा-कॉलेजातील एखाद्या मित्राशी-मैत्रीणीशी जुळलेले संबंध आयुष्याच्या अंतापर्यत आणखीन घट्ट करून आपण ते निभावत असतो. हि मैत्री वरवरची नसते.एकमेकांंच्या सुखात-दुखात जमेल तसे सामील होताना एक दुस-याच्या कठीण काळात आधार देण्यासाठी, मदत करण्यासाठी एकमेकांमधील मैत्रीचे नातेच कामी येत असते. कोणत्याही प्रकारचा स्वार्थी हेतू वा गैरफायदा घेण्याचा विचार नसल्याने हि मैत्री अधिकाधिक फुलत-रूजत अन् वाढत असते. अनेकांनी मैत्रीमध्ये स्वार्थीपणाचा अनुभव घेतला असेल किंवा आला असेल.मात्र तो अनुभव कधी कधी तिथेच सोडून दिल्याने मैत्रीमध्ये खंड पडण्याची परिस्थिती शक्यतो उद्भवत नाही.

   मला वाटते मैत्रीचे रोपटे वाढण्यासाठी खतपाणी एकानेच घालून चालत नाही. वेळ मिळेल तशा गाठी भेटी, संवाद साधणे, फिरायला जाणे या गोष्टी मैत्रीरूपी वेल अधिक उंच जाण्यासाठी हातभार लावणा-या ठरतात.मात्र कधी कधी होते काय, मैत्री जपण्याचा प्रयत्न एकतर्फी होत असतो.समोरील मित्र/ मैत्रीणीकडून ती अपेक्षापूर्ती होत नाही.त्यामुळे ती मैत्री तुुुुटक तुटक  होऊन मैत्रीमधला ओलावा कुठेतरी हरवून जातो. काहि मित्र ज्यांना आपण जिवलग समजत असतो ते तर आपल्या आयुष्यातून काहिच कारण न सांगता, फक्त त्यांच्यापुरता विचार करून अलगद दुर होतात. यामागची कारणे काहिही असू शकतात. आपण त्यांच्याशी चुकीचे वागलो वा त्यांच्या सोयीनुसार वागलो नाही असा ग्रह कदाचित त्यांनी करून घेतलेला असू शकतो किंवा पद, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टींबाबत ते सरस ठरल्याने आपण समजत असलेल्या मैत्रीमध्ये आपला पत्ता कट झालेला असतो. यापैकी कुठलेच कारण उघड न करता मैत्रीचा केलेला शेवट पाहून ते आपले खरेच मित्र होते की मैत्रीचा केवळ दिखावा होता हि शंका मनात डोकावून जाते.असो.
   वास्तविक एकमेकांचा स्वभाव,आवडी-निवडी व अन्य बाजू लक्षात घेेेेऊन मैत्र जुळत असते.असे असले तरी मैत्री तुटायला जशी काहि कारणे पुरेशी ठरतात, तशीच काहिच कारण न सांगता देखील मैत्री सबंध दृढ होत जातात.
    आजच्या युगात मैत्रीच्या व्याख्या बदललेल्या आहेत. आजकाळची एखाद्यासोबतची मैत्री स्वैर अन्  मोकळीढाकळी झालेली दिसून येते.ज्या काळात मुलींशी बोलायला, त्यांच्या पुढ्यात उभे राहायला शरम यायची, त्याच मुली हल्ली मैत्रीसाठी मुलांकडे हात मागतानाचे दिवस आले आहेत. नुसत्या सोशल मिडीयावर मैत्री दिनाच्या शुभेच्छा पसरवून हा दिवस लिमिटेड न ठेवता प्रत्यक्ष भेटून, गिफ्टची देवाण घेवाण करून, फिरायला जाऊन मौज मस्ती करत तो एंजॉय केला जातोय.एकीकडे  प्रत्यक्ष मैत्री बहरत ठेवतानाच, दुसरीकडे सोशल मिडीयाच्या व्दारे अनेक क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रेटी यांच्यासोबत आभासी मैत्री करण्याकडे तरूणाई च नव्हे तर इतरांचा देखील वाढता कल दिसून येतोय. त्या त्या क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीचे योगदान, त्यांचा वावर, त्यांची मते या बाबी लक्षात घेऊन मैत्रीची जवळीक साधलेली असते. परंतु  दुरवरची अर्थात आभासी असणारी हि मैत्री प्रत्यक्षात अस्तित्वात येऊन ते मैत्र वृध्दिंगत होण्याचे भाग्य क्वचितदा किंवा काहिजणांनाच  लाभत असावे.
     एकंदरित काय कुणासोबतही मैत्रीचे बंध विणताना हात आखडता घेऊ नये. त्याचबरोबर अवास्तव अपेक्षा, स्वार्थीपणा डोक्यात ठेवून,  अटी घालून मैत्री करू नये.  सीमा नसणा-या मैत्रीच्या वर्तृळात नानाविध स्वभावाच्या मित्र मैत्रीणींना सामावून घ्यावे. अमूक जणाशी,  अमूक काळ,अमूक कारणासाठी अशी मर्यादित मैत्री न ठेवता अमर्यादित मैत्रीचा आनंद मनापासून उपभोगायला हवा...शेवटी मैत्रीचा अध्याय कधीच न संपणारा असतो नाही का..मित्रहो...

--पंकजकुमार पाटील ( पंक्या)
७ ऑगस्ट २०१९